अमरावतीमधून अपहरण आणि हत्येचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात अमरावती जिल्ह्यतील चांदूर रेल्वे येथील अपहरण केलेल्या मुलीला आरोपीने मध्यरात्री परत घरी आणून सोडलं.
मात्र आरोपीचा त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा अपहरणकर्ता असलेला मुख्य आरोपी नईम खान याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. चांदुर रेल्वे पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.
आरोपीला अटक करण्यासाठी नागरिकांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली होती. मात्र, याआधीच हल्ल्यात आरोपीचा मृत्यू झाला.
काही वेळाने आरोपी पुन्हा त्याच परिसरात आला असता त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. चांदूर रेल्वे शहरातील या घटनेत मुख्य आरोपी नईम खान याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चांदूर रेल्वेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपी एका गाडीतून मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले. यानंतर कुटुंबियांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी मुलगी आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली होती.
परंतु एक दिवस उलटून गेल्यावरही मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली. मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला होता. पोलीस दोन दिवसांपासून त्या मुलीचा शोध घेत असताना आरोपीने गुरुवारी रात्री अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडलं. आरोपी हा परत त्याच परिसरात आला तेव्हा अज्ञात जमावाने त्याचा खून केला.