ताज्याघडामोडी

शाळा सुटली, जेवण केलं, पोहण्यासाठी तलावावर; गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा करुण अंत

ग्रामीण भागामध्ये विशेषत: गाव खेड्यानजीक पाझर तलाव हे लहानपणापासूनच तिथल्या गावकऱ्यांना काही नवीन नसतात. आजही प्रामुख्याने सातपुड्यासारख्या कुशीत म्हणा किंवा गावाजवळ जाणाऱ्या नद्या या ग्रामीण भागात असतातच. सकाळची शाळा करून घरी परतल्यानंतर १० वर्षीय चिमुकल्यांनी जेवण केलं. त्यानंतर पोहण्याचा मोह झाल्याने दोघेही गाव शिवारातील तलावावर गेले. मात्र, खोल पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि गाळात फसून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात २८ फ्रेब्रुवारीला घडली. अनिकेत जाधव आणि आदित्य जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत. सायंकाळी जनावरे पाणी पाजण्यासाठी शेतकरी तलावावर गेल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी तात्काळ तलावात शोध घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं चिखली तालुक्यातील करवंड गाव हळहळलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिकेत चौथीत तर आदित्य हा पाचव्या वर्गात शिकत होता. दोघे मित्र २८ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या धरणात पोहायला गेले होते. अनिकेतला पोहायला येत होते. मात्र, आदित्यला पोहता येत नसल्यामुळे पाण्याच अंदाज न आल्याने दोघांचा धरणात गाळात फसल्यामुळे बुडून दुर्दैवी अंत झाला.

संध्याकाळी गावातील शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेले होते. त्यांना तलावाच्या काठावर मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर धरणावर गर्दी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

गावातीलच एका जणाने पाण्यात उतरून शोध घेतला. त्यांच्या पायाला मुलांचे डोके लागले. त्यामुळे दोन्ही मुले गाळात फसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांच्या मदतीने अनिकेत आणि आदित्यचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना मनाला चटका देणारी आहे. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण घटनेनंतर अख्खं गाव स्तब्ध झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *