ताज्याघडामोडी

संकटात सापडलेल्या ठाकरेंना धक्का, विश्वासू नेता पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र

उद्धव ठाकरे गटाचे भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी आज दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या संकटात तसेच पक्षचिन्ह आणि पक्षनाव गमावलेल्या ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील हे संचालक होते. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील यांनी अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे उस्मानाबादचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तक्रार केली होती.

ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह सौ सिंधु यांच्या बरोबर झाला होता. त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य ७ मार्च १९९३ रोजी झाले होते तर दुसरे अपत्य १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाले होते. या नंतर पाटील यांनी सौ. राणी उर्फ उषा यांच्या बरोबर दुसरा विवाह केला. त्यांच्या पासून पहिले अपत्य १५ सप्टेंबर २००६ रोजी झाले तर दुसरे अपत्य १५ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. या चारही अपत्यांच्या जन्माची नोंद बार्शी नगर परिषदेत करण्यात आली होती.

दरम्यान २००१ नंतर २ अपत्य असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती. याची सुनावणी लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी करताना पुढील ५ वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.

ज्ञानेश्वर पाटील हे भूम परंडा मतदारसंघातून २ वेळेस शिवसेनेचे आमदार होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे जवळचे निकटवर्तीय होते. बंडखोरीनंतर ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव ठाकरे गटात आहेत. भूम परंडा मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांचं अधिक प्राबल्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *