अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अनेक आकर्षक घोषणा असलेल्या या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी मोठे स्वागत केलेले असताना दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. लोकसभा आणि देशातील ९ राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून तो फसवा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचे अजित पवार म्हणाले. देशातील मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी प्राप्तीकरावर सूटमर्यादा वाढवण्यात आला आहे असा दिखावा या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची ठोस तरतूद अर्थसंकल्पात दिसत नाही असे सांगतानाच हा अर्थसंकल्प म्हणजे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा अर्थसंकल्प असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.
सन २०१८ ते २०२२ या कालावधीत देशाचा जीडीपी वाढीचा दर सरासरी ३ टक्के इतका होता. हे पाहता हा देशाचा अमृतकाळ कसा काय होऊ शकतो, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. देशाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या रुपात महाराष्ट्र राज्य हे सर्वाधि कर देत असते. मात्र अशा महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही मिळाले आहे अे वाटत नाही, असे म्हणत हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे, तसेच तो चुनावी जुमला असणारा असाच अर्थ संकल्प आहे, अशा शब्दात पवार यांनी निशाणा साधला आहे.