‘सध्याचं सरकार हे बेकायदेशीर आहे. हे सरकार टिकणार नाही. अधिवेशनातलं मुख्यमंत्र्यांचं भाषण गल्लीतलं होतं. त्यांनी आपण कुठे बोलतोय याचं भान ठेवायला हवं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
तसंच शिंदे गटातील आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील, असा दावाही राऊतांनी केला. संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिंदे सरकारवर सडकून टीका केली. तसंच दीपक केसरकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांना संधी मिळाली पण ती बेकायदेशीर पद्धतीने मिळाली आहे.
त्यांना संधी मिळाली आहे पण त्यांनी काम संयमाने काम केलं पाहिजे. विधानसभेतील त्यांचं भाषण हे वैयक्तिक नाही. त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे होतं. राज्यातील विकासावर बोलणं गरजेचं होतं.
रस्त्यावरची भाषा असली तरी आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देऊन आपण विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलताय, एक मंत्री म्हणून बोलत असताना भान ठेवून बोललं पाहिजे, असं म्हणत राऊत यांनी शिंदेंच्या भाषणाची खिल्ली उडवली.
आत्मपरिक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. गद्दारांनी आम्हाला आत्मपरिक्षणाबद्दल सांगू नये. आम्हाला त्याची अजिबात गरज नाही. खरं तर त्यांनाच आत्मपरिक्षणाची गरज आहे, असा टोला राऊत यांनी केसरकर यांना लगावला.
अब्दुल सत्तार बोलतायत त्यांचा आतूनच गेम होतोय. सत्तारांनी आत काय चाललंय ते बोललेत. शिंदे गटातील अनेक आमदार हे नाराज आहे. ते स्वत:ला भाजपमध्ये विलिन करून घेतील. हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे शिंदेगटातील नेत्यांना शिवसेना स्विकारणार नाही आणि दुसरा त्यांच्याकडे कोणता पर्याय नाही. त्यामुळे शिंदेगटातील नेते भाजपत जाणार आहे. केसरकरांनी आणि त्यांच्या गटानं आत्मपरिक्षण करायला हवं, असंही राऊत म्हणाले.