गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच एकीकडे सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना धरणगाव शहर तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरले आहे.
‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली. कालू सोनवणे (वय ३० रा, दहिवद तांडा, शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
धरणगाव शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास कालू सोनवणेचा जिनिंगमधील काही बिहारी मजुरांसोबत किरकोळ विषयातून वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून फरार झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली आहेत.