राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सांझी गावात मुलाच्या मृत्यूने दुखावलेल्या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. गावातील भल्लाराम मेघवाल यांचा एकुलता एक मुलगा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. बुधवारी दुपारी भल्लाराम त्याला दाखवण्यासाठी रोहत रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र तीन वर्षांच्या भीमरावचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर गावाकडे परतत असताना कुटुंबाने आत्महत्या केली. भल्लारामसोबत त्यांची पत्नी मीरा यांनीही त्यांची पाच वर्षांची मुलगी निकिता हिला सोबत घेऊन मृत्यूला कवटाळले.
घटनेची माहिती मिळताच रोहत पोलीस ठाण्याचे प्रभारी उदय सिंह पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह रोहत रुग्णालयाच्या शवागारात आणले आहेत. भल्लारामच्या कोटच्या खिशातून सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात त्यांचा एकुलता एक मुलगा भीमराव आजारपणाने मरण पावल्याने तो स्वतः संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचे लिहिले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. मृत भल्लाराम मेघवालच्या घरात एकूण पाच सदस्यांपैकी आता फक्त एक आठ वर्षांची मुलगी उरली आहे. ती घटनेच्या वेळी शाळेत गेली होती.