उत्तर प्रदेशातील सहरानपूरमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. भीक मागून जगणारा ११ वर्षांचा मुलगा चक्क लखपती निघाला आहे. करोना काळात संबंधित मुलाच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळं मुलाला पोट भरण्यासाठी भीक मागावी लागत होती. संबंधित मुलाच्या आजोबांनी त्याच्या नावावर संपत्ती करुन ठेवली होती. तेव्हापासून त्याचे नातेवाईक त्याला शोधत होते. आजोबांनी नातू एक दिवस नक्की भेटेल या विश्वासानं त्याच्या नावावर घर आणि शेती करुन ठेवली होती.
भारतात करोना संसर्गाची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. देवबंद नागलच्या पंडोलीमध्ये राहणाऱ्या इमराना या पतीसोबत झालेल्या वादामुळं निघून गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या पतीनं अनेकदा त्यांना माघारी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या परत आल्या नाहीत. इमराना मुलासह उत्तराखंडच्या कलियरमध्ये गेल्या होत्या. नातेवाईकांनी इमराना यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या सापडल्या नाहीत.
पत्नी आणि मुलगा दुरावल्यानं इमराना यांच्या पतीचा मृत्यू झाला.यानंतर काही दिवसांनी करोना संसर्ग वाढला आणि लॉकडाऊन देखील लागलं. काही दिवसांनी इमराना यांचा देखील मृत्यू झाल्यानंतर साहजेब अनाथ झाला.त्याला अनेक दिवस भीक मागायला लागलं. साहजेबच्या आजोबांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियापासून वृत्तपत्रांमध्ये त्यांनी फोटो देखील छापला होता.
काही दिवसांनी कलियरमध्ये साहजेब हा त्याच्या दूरचा नातेवईक मोबिनला आढळला. मोबिननं व्हाटसअपवरील फोटोवरुन संबंधित मुलगा साहजेब असल्याचं कन्फर्म केलं. त्यानंतर नातेवाईकांना कळवलं. यानंतर मोबिननं साहजेबला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं.