गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलाने घरातील पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपक बाळासाहेब मुंडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील देवगाव येथे सदर घटना घडली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून घरातील पत्र्याच्या लोखंडी आडूला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.