जिथे प्रेम असतं तिथे नाती, समाज, वय काहीच दिसत नाही, असं म्हणतात. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये समोर आला आहे. येथे भाच्याच्या प्रेमात वेडी झालेल्या आत्याने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. घरच्यांच्या हे लक्षातही आलं नाही. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता या जोडप्याने राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
भरतपूर येथील रहिवासी असलेली २९ वर्षीय तरुणी २१ सप्टेंबर रोजी घरातून पळून गेली होती. तिने मथुरा येथे राहणाऱ्या तिच्याच वयाच्या भाच्या्यासोबत कोर्टमॅरेज केले. दोन दिवसांनंतर २३ सप्टेंबर रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
यादरम्यान दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्याबाबत माहित झालं. आता मुलीने ट्वीट केलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस आमदार सचिन पायलट यांच्यासह स्थानिक पोलीस-प्रशासनाला टॅग करत तिने माहेर आणि सासरच्या बाजूने सुरक्षेची मागणी केली. “दोन्ही कुटुंबं मिळून त्यांना त्रास देत आहेत. मानसिक ताण देत आहेत. माझा जीव धोक्यात आहे. मी माझ्या स्वेच्छेने लग्न केले आहे, उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही हे लग्न वैध ठरवले आहे. देवा मला मदत कर.”
भरतपूर पोलिसांनीही तरुणीच्या मदत मागणाऱ्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी लिहिले की, “याप्रकरणी संबंधित स्टेशन प्रभारींना निर्देश दिले आहेत, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या आणि निवेदन द्या, तुम्हाला सुरक्षा दिली जाईल.”