राज्यात सध्या पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या चार ते पाच दिवसामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले.
त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. आता आगामी 4 दिवस पुन्हा पाऊस बरसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगा, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत आगामी 4 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
त्याचबरोबर उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात आगामी 4 दिवस पाऊस पडणार आहे.