प्रियकरा सोबत लग्न करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेने मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा कट रचला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हा प्रकार समोर आला आहे.
या महिलेने तिच्या 2 मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने जेवणात विषप्रयोग करून कुटुंबातील इतर चार सदस्यांना ठार मारण्याचा कट रचला होता.
ज्योती (21) आणि अर्चना (20) या मुलींची आई राजकुमारी (45) यांनी कुटुंबावर विष प्रयोग केला. या कटामध्ये ज्योती आणि अर्चनाचे प्रियकर अभिषेक (23) आणि दीपक (22) हे देखील सामील होते.
रविवारी ग्रेटर नोएडा मधील जुनेदपूर गावात पाच आरोपींनी मिळून रात्रीच्या जेवणात विष मिसळले. जेवणातून विष प्राशन केल्यामुळे राजकुमारीचा पती देवेंद्र, त्यांचे दोन भाऊ आणि सासू हे कुटुंबातील चारही सदस्य बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने चारहीजण सुखरूप होते. मात्र यावेळी तपासादरम्यान असे समोर आले की, जेवणात विषबाधा झाली होती.
त्यामुळे दोन पोलिस पथकांना या प्रकरणाच्या चौकशीचे काम सोपविण्यात आले. या घटनेनंतर कुटुंबातील सून, तिच्या दोन मुली आणि त्यांचे दोन प्रियकर हे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. भारतीय दंड संहिता कलम 120B (गुन्हेगारी कट रचणे), 328 (विषाने दुखापत करणे) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.