कोल्हापूर जिह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून राज्यासमोर आदर्श ठेवला. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
आज हिंदुस्थान विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. आता सरकारने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायती काम करावे, असे आवाहन शासन परिपत्रक जारी करत करण्यात आले आहे.
या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱया हेरवाड ग्राम पंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापुरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. हेरवाड ग्राम पंचायत पॅटर्न राज्यात राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामविकास विभागाचा पुढाकार
विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व ग्राम पंचायतीनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे.