उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका घरात लग्नाचे सर्व कार्यक्रम जल्लोषात संपन्न होत होते. रात्री जेवण झाल्यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळीच नववधूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
घरात वधूच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर विवाह समारंभासाठी आलेल्या नातेवाईकांनी खोलीत धाव घेतली. यावेळी नातेवाईकांना वधू काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
ही घटना झाल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेला आहे. मात्र वधूच्या प्रियकरानेच हि घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त होत आहे. वधूच्या हत्येमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुलीचे वडील खुबी राम यांनी सांगितले की, लग्नाचा हार घातल्यानंतर माझी मुलगी खोलीत खुर्चीवर बसली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती आला आणि मुलीच्या कपाळावर गोळी झाडून पळून गेला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.