बीड शहरातील एका महिलेस चारित्र्याच्या संशयावरून तिच्याच पतीने तब्बल चार वर्षांपासून घरात डांबून ठेवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडसी पाऊल उचलल्यामुळे या महिलेची आज सुटका करण्यात आली.
जालना रोडवरील रुपाली मनोज किन्हीकर यांचा वीस वर्षांपूर्वी श्रीमंत घरामध्ये विवाह झाला. सुखी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून रुपाली यांनी संसाराला सुरुवात केली. सुरुवातीची दोन-तीन वर्षे सुखी संसारात आनंदात गेली. त्यानंतर रुपालीचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. पत्नी रुपाली एका दुकानात कामाला जात होत्या, मात्र नवरा संशय घेत असल्याने त्यांना काम बंद करावे लागले. संशयामुळे तो तिचा दररोज छळ करत असे.
गेल्या सतरा वर्षांपासून त्याने पत्नी रुपालीला घराबाहेरसुद्धा पडू दिले नाही. गेल्या चार वर्षांपासून आरोपी मनोजने रुपालीचे हातपाय बांधून तिला घरामध्ये डांबून ठेवले होते. पती मनोज यांचे पत्नीला छळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होते.
रुपाली यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधिलाही पतीने त्यांना जाऊ दिले नाही. स्वत:च्या पोटच्या मुलांनाही तो त्रास देत असे. घरात कोंडून ठेवल्यामुळे रुपाली शारीरिक आणि मानसिकदृष्टया थकली होती. वृद्ध महिलेसारखी तिची अवस्था झाली.
या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या खोलीत रुपालीला डांबून ठेवले होते. तेथे प्रचंड दुर्गंधी येत होती. तिच्यासोबत तिच्या दोन्ही मुलांना याच खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. अखेर पोलिसांनी आज या महिलेची आणि तिच्या मुलांची सुटका केली. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.