भाच्याचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अनिल रामचंद्र बारड असं या मृत माणसाचं नाव आहे.
कोल्हापूर येथील धामोड व बुरंबाळी (ता.राधानगरी) दरम्यानच्या हॉटेल निसर्गमध्ये जेवल्यानंतर तंबाखु खाण्यासाठी चुना मागण्यावरून विकास नाथाजी कुंभार (रा. कुंभारवाडी) याची व जितेंद्र केरबा खामकर (रा. खामकरवाडी) या दोघांची हॉटेलमध्ये वादावादी झाली.
हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने धामोड येथे राहणारे आपले मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावून घेतले व रात्री 11 वाजता ते दोघेजण कुंभारवाडी येथे गेले. त्यावेळी आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकूने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. पाठीत व खांद्याच्या खाली वर्मी वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी विकास कुंभार याला राधानगरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह कोळी हे करत आहेत. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होते.