ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी; डोळ्यांदेखत ६२ एकर ऊस जळून खाक

अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शॉर्टसर्किटमुळं ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. जालना जिल्ह्यातही ६२ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळं आग लागून ६२ एकर ऊस जळाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या पळखेडा ठोंबरी या गावात घडली आहे. या हंगामात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पळखेडा शिवारात पाचशे एकरच्यावर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच काल रविवारी सकाळी दहाच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतातील विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने उसाला आग लागली.

जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली. शेतकऱ्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग अधिक पसरत होती आणि हा हा म्हणता आगीचे लोण परिसरात पसरू लागल्याने गावकऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

तो पर्यंत बघता बघता ३९ शेतकर्यांचा ६२ एकरवरील ऊस जळून खाक झाला. ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *