कामगारांच्या वेतनात ४१ टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता एस टी कामगारांनी एक पाऊल मागे घेत आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित केले आहे.आमदार गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली असून विलिनीकरण होईपर्यंत लढा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
एस टी कर्मचार्याचे शासकीस कर्मचार्यांमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानावर गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील एस टी ची वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनात मुख्य तिढा हा विलिनीकरणाचा होता. त्यावर तात्पुरता तोडगा म्हणून राज्य सरकारने एस टी कर्मचार्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला.
तसेच दर महिन्यांच्या १० तारखेपर्यंत कर्मचार्यांचे पगार होईल, याची हमी सरकारने घेतली आहे. तसेच समितीच्या अहवालानंतर विलिनीकरणावर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर आता कामगारांशी चर्चा करुन गोपीनाथ पडळकर यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.
जे पदरात पडतेय ते घेऊन पुढे जायचे आहे. लढाईतील पहिला टप्प्यात आम्ही जिंकलो आहेत. विलिनीकरणाचा निर्णय घेण्यास वेळ लागणार असल्याने आता तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे पडळकर यांनी सांगितले. आंदोलन मागे घेण्याची घोषणा झाली असली तरी राज्यभरातील कर्मचारी हे मान्य करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.