ताज्याघडामोडी

कार्तिकी एकादशीला पंढरीत विठ्ठल दर्शन करून गेलेल्या भाविक पती पत्नीची आत्महत्या

उल्हासनगरात पती पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनं पोरकी झाली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी पंढरपूरला देव दर्शन घेत आई वडिलांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधी नगर परिसरात सचिन आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या 7 आणि 4 वर्षांच्या दोन मुलांसह वास्तव्याला होतं. आज सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास घेतल्याचं त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला

सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन आले. त्यानंतर शुक्रवारी ते शर्वरी यांच्या माहेरी चिपळूणला जाऊन आले, तर शनिवारी ते सचिन यांच्या वडिलांकडे डोंबिवलीला जाऊन आले.

राहत्या घरी गळफास

शनिवारी रात्री मुलं झोपल्यानंतर त्यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच हे दाम्पत्य देवदर्शन आणि परिवाराला भेटण्यासाठी गेल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटने प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *