Uncategorized

तलाठी,ग्रामसेवकांनी कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे !

मागील काही दिवसापासून तलाठी संपावर आहेत.त्यांच्या संपाबाबत सामान्य जनतेत अजिबात सहानुभूती आढळून येत नसून आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य जनता,अतिवृष्टी मुळे शेतकरी वर्ग आणि इ पीक पाहणी नोंदणी पद्धतीत येत असलेल्या अडथळ्यामुळे वैतागलेले ग्रामस्थ तर फेरफार नोंदीच्या बाबत अधिच असलेल्या कृत्रिम अडचणीत झालेली वाढ यामुळे सामान्य जनतेमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.आणि त्यामुळेच शासन आणि ग्रामस्थ यांना जोडणारा शासनाचा महत्वाचा अंतिम दुवा असलेल्या तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी निवासी राहण्याच्या आदेशाची कठोर अमलबजावणी केली जावी.कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात असल्याच्या जोडलेल्या पुराव्याची चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधीकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी १ मे २०१९ या महाराष्ट्र दिनापासून तलाठी,ग्रामसेवक यांनी कर्तव्याच्या ठिकाणी निवासी राहावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे आदेश काढले होते.त्या आदेशाची कठोर अंमलबजावणी विद्यमान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी करावी अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे. 

                  तलाठी,मंडळअधिकारी,ग्रामसेवक हे शासनाच्या नियमानुसार निवासी पदे आहेत.सदर पदाची भरती करतानाच शासनाने नमूद केलेल्या अटींमध्ये कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहावे लागेल असे स्पष्टपणे नमूद केलेले असते.मात्र बहुतांश तलाठी,मंडळ अधिकारी व ग्रामसेवक हे कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात नसल्याने ग्रामिण जनतेला मोठया अडचणींचा सामना करावा लागतो.ग्रामस्थांना आपल्या कामासाठी संपर्क करुन तलाठी,मंडल अधिकारी अथवा ग्रामसेवक हे जेथे असतील तेथे जावून आपले काम करुन घ्यावे लागते.अनेक तलाठ्यांचे मोबाईल बंद असल्याचा अनुभव वेळोवेळी ग्रामिण जनतेला येत असून त्यामुळे अगदी सकाळपासून हे नागरिक तलाठ्याच्या शोधात असल्याचे दिसून येते.ग्रामसेवकांच्या बाबतीतही हीच परिस्थीती असून ग्रामपंचायतीच्य विविध दाखल्यांसाठी ग्रामसेवकाची गाठ पडणे हे खेड्यातील जनतेसाठी एक मोठे दिव्यच असते.केंद्र आणि राज्यशासनाने अनेक योजना या थेट ग्रामपंचायत पातळीवरुन राबविण्याच्या हेतूने तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असून बहुतांश कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात नसल्याचे आढळूण आल्याने अशा कर्मचार्यांवर कारवाई करावी असे थेट आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशानुसार आता 1 मे पासून तलाठी,मंडल अधिकारी व ग्रामसेवकांनी कर्तव्याच्या ठिकानी निवासी राहणे बंधनकारक करण्यात आले होते.मात्र यापुर्वीही असे आदेश अनेक वेळा जिल्हाधिकारी स्तरावरुन देण्यात आले होते.या आदेशास कायदेशीर मार्गाने ठेंगा दाखविण्यासाठी ज्या गावात नेमणूक आहे त्या गावातील एखाद्या ग्रामस्थाला हाताशी धरुन त्याच्याकडील एखाद्या खोलीचा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नवासी भाडेकरार करुन आपण कर्तव्याच्या ठिकाणी निवासी रहात असल्याचा देखावा करण्यात काही कर्मचारी यशस्वी ठरले होते.आताही हाच बोगस भाडेकराराचा फंडा वापरला जाणार आहे.असे बोगस भाडेकरार करण्यास सहकार्य करुन संपुर्ण गावास वेठीस धरण्यास तलाठी,मंडल अधिकारी व ग्रामसेवकास सहकार्य करणार्या गावकर्याबाबत ग्रामस्थांनी जागरूक राहणे गरजेचे झाले असून अशा प्रकारे बोगस भाडेकरार रोखणे गरजेचे आहे.त्यासाठी निवासी रहात असलेल्या जोडलेल्या पुराव्याची पडताळणी होणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *