ताज्याघडामोडी

24 तासांत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा; 6 जिल्ह्यांना अधिक धोका

 

गेली दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे. आज मुंबईसह पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत पावसाची धुव्वाधार बॅटींग होण्याची शक्यता आहे.

ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. पालघर वगळता संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग औरंगबादसह मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्वचं जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.उद्या मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. उर्ववरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *