ताज्याघडामोडी

साबरमती आश्रम पाडून संग्रहालय उभारण्याचा गुजरात सरकारचा निर्णय; काँग्रेसचा विरोध

गुजरात सरकारने साबरमती येथील महात्मा गांधी यांचा आश्रम पाडून तेथे संग्रहालय उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे तो धक्कादायक असून सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.

या आश्रमात महात्मा गांधी यांनी तेरा वर्ष वास्तव्य केले आहे. त्यामुळे या जागेला आणि त्यांच्या आश्रमाला मोठे महत्व आहे. हा आश्रम देशभरातील लोकांसाठी एक श्रद्धेचे स्थान राहिला आहे. महात्मा गांधी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कसे राहात असत याची माहिती लोकांना या आश्रमातील भेटीतून मिळत असते.

त्यामुळे हा आश्रम पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी मागणी गहलोत यांनी केली असून या निर्णयात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गुजरात सरकारने साबरमती आश्रमाच्या पुनर्रविकासाचा हा प्रकल्प राबवण्याचे योजले असून त्यासाठी बाराशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत असे सांगितले जाते.

आश्रमात अत्यंत साध्या पद्धतीने महात्माजी राहात असत आणि म्हणूनच त्याला आश्रम म्हणतात, येथे संग्रहालय उभारण्याची गरज नाही असेही गहलोत यांनी म्हटले आहे. देशाचा हा महान ऐतिहासिक ठेवा नष्ट केला गेला तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहींत असेही गहलोत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *