मोदी सरकार कोट्यवधी नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जीवन विमा सुविधा उपलब्ध करून देते. मोदी सरकार आता तुमच्या घरासाठीही विशेष योजना जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार गृह विमा योजना जाहीर करू शकते, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
दोन कुटुंबातील सदस्यांना 3 लाख रुपये मिळणार
3 लाख रुपयांचे हे विमा संरक्षण घरगुती वस्तूंच्या भरपाईसाठी आहे. याखेरीज दोन कुटुंबातील सदस्यांना 3 लाख रुपये मिळतील. वैयक्तिक अपघात कव्हर पॉलिसी घेणार्या सदस्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. केंद्र सरकारची ही योजना सर्वसाधारण विमा कंपन्यांमार्फत उपलब्ध करून दिली जाईल आणि त्याचे प्रीमियम लोकांच्या बँक खात्यात जोडले जातील.
प्रीमियम किती द्यावे लागणार?
या पॉलिसीसाठी सामान्य विमा कंपन्यांना एक हजार रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम घ्यायचे आहेत, असे अहवालात म्हटले आहे. तर सरकारला हे जवळपास 500 रुपये ठेवायचे आहे. केंद्र सरकारला ही योजना मोठ्या प्रमाणात राबवायची आहे. यामध्ये पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांना सुरक्षा कवच मिळू शकेल. सामान्य लोकांपासून कंपन्यांपर्यंत ही योजना गेमचेंजर म्हणून सिद्ध होऊ शकते. सरकार ही योजना राबविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या हे प्रकरण प्रीमियम रकमेवर अडकलेय. या बातमीनंतर सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे.