राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुढील चार दिवस (दि २९, ३० ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ) राज्याच्या किनारपट्टी भागात आज सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दि ३०, ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस बरसण्याबरोबरच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.