ताज्याघडामोडी

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, ६ हजार १०० शिक्षकांच्या भरतीला राज्य सरकारची परवानगी

राज्यात तब्बल २ वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य सरकारने घेण्याचे ठरवले आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या सध्या कोरोनापरीस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे राज्य सरकारने या परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. राज्यात एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षण विभागात टप्प्याटप्प्यात एकूण ६ हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे अखेर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध झाली आहे.शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. राज्यात २०१८-१९ नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे. २०१९ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते. शालेय शिक्षण विभागाने मागील आठवडय़ात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षे मुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *