ताज्याघडामोडी

इतिहासाच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातून मुघलांना वगळले; आता ‘यांची’ थोरवी शिकवणार

 विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने इतिहासाच्या नव्या अभ्यासक्रमाची जुळणी केली आहे. युजीसीच्या या प्रस्तावित अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवण्यात आले असून त्यानुसार देशावरील मुस्लीम आक्रमकांचा इतिहास अभ्यासातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सम्राट अकबर आणि मुघलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा यूजीसीने तयार केला असून त्यावर आतापासूनच प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील राजकीय बाबींऐवजी धार्मिक बाबींवरच नव्या अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचा आरोप होताना दिसतो आहे.

तर भारतावर आक्रमण करणाऱ्या आणि येथील अनेक वास्तू उद्‌ध्वस्त करणाऱ्या आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे, असा दावा युजीसीकडून करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाराव्या शतकापासून सतराव्या शतकांपर्यंतच्या इतिहासात विशेषत: हा बदल प्रस्तावित असल्याचे बोलले जाते आहे.
वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची शक्‍यता व्यक्‍त केली जातेय.

वैदिक काळातील भारत कसा होता, वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर विद्यार्थ्यांना धार्मिक बाबी शिकवण्यापेक्षा जातीव्यवस्था दूर करणारी आंदोलने, सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारा अभ्यास शिकवला जावा, अशी मागणी केली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *