तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…यासह प्रेयसीच्या सोबत लग्न करण्यास येणाऱ्या अडथळ्याची माहिती देणारी चिट्ठी लिहून अनुभव धाकडे (वय – 33, राहणार रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) या तरुणाने आत्महत्या केली आहे.
अनुभव धाकडे याचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. त्यांनी एकमेकांना लग्नाचे वचनही दिले होते. मात्र प्रेयसीने दुसऱ्यासोबत साखरपुडा केल्याची माहिती समजल्यानंतर तो दु:खी झाला. ज्या झाडाखाली ते रोज भेटायचे त्याच ठिकाणी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी तरूणाने चिठ्ठीत लिहिले आहे की, ‘त्या रात्री माझ्या घरचे झोपल्यानंतर तू मला येऊन भेटली. तेव्हा तू मला घट्ट मिठी मारून रडत होतीस. तेव्हा मी तुला सोडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु तरीही तू समजत नव्हती. तुझा साखरपुडा होण्याच्या आधी मी तुझ्या पप्पांना फोन करून सर्व सांगितले होते.
परंतु तुझे पप्पा तुला फाशी द्यायची धमकी देऊन तुझा विचार बदलला. त्यानंतर माझ्यावर बलात्काराची केस करत होते. परंतु तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…’