ताज्याघडामोडी

“माऊलीं’चा आळंदीतच 19 जुलैपर्यंत मुक्काम; पालखीचे शुक्रवारी प्रस्थान

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – आषाढी वारीसाठी शासकीय निकषांसह मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ वद्य अष्टमीला (2 जुलै) सायंकाळी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे. विठू भेटीसाठी आसुसलेल्या अलंकापुरीत विठूनामाचा जयघोष मंदिरातअन्‌ घराघरात एवढेच नव्हे वारकऱ्यांच्या श्‍वासाश्‍वासातही सुरू झाला आहे. परंपरेनुसार, माऊलींच्या मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू झाला. यंदाही गतवर्षीप्रमाणेच विशेष वाहनाने माऊलींच्या चलपादुका पंढरपूरला मार्गक्रमण करणार आहेत.

– असा असेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : व्हिडीओ

वारकऱ्यांची आस त्यांना स्वस्थ बसू देणार नाही.त्यांची पावले कदाचित आळंदीकडे वळू शकतात. साथीच्या या काळात ते टाळण्यासाठी सोमवारपासून आळंदी शहरासह नजीकच्या अकरा गावांमध्ये 4 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड लावून नाकाबंदी केली आहे.

प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी दिलेल्या 100 वारकऱ्यांची बुधवारी (दि. 30) आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच चाचणीनंतर त्या वारकऱ्यांचे वास्तव्य फ्रुटवाले धर्मशाळेत असेल. शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमावली पाळून प्रस्थान सोहळा पार पडणार असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे – पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, प्रस्थानानंतर दि. 3 ते 19 जुलै पर्यंत पालखी सोहळा आळंदीतच माऊलींच्या आजोळघरी असेल. 19 जुलैला माऊलींच्या चलपादुका सकाळी 10 वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. 19 ते 24 जुलै माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर 24 जुलै पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास करतील.

प्रस्थान सोहळा कार्यक्रम (2 जुलै)

* पहाटे 4 ते 5.30 पवमान पुजा आणि अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती

* सकाळी 9 ते 11 वीणा मंडपात कीर्तन

* दुपारी 2.30 वाजता माउलींच्या समाधीवर पोशाख. वीणा मंडपात मानकऱ्यांना मानाचे पागोटे वाटप

* दुपारी 3 वाजता वारकऱ्यांना पान दरवाजातून प्रस्थानासाठी प्रवेश

* सायंकाळी 4 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ

* सायंकाळी 7 वा. माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी

सर्व दिंड्यांतील विणेकऱ्यांना परवानगी?

शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे मर्यादित संख्येत प्रस्थान सोहळा होणार आहे. मात्र संस्थान कमिटीची इच्छा आहे की, प्रत्येक दिंडीतील एका वारकऱ्याला किंवा विणेकऱ्याला प्रस्थानच्या वेळी प्रतिनिधीत्व मिळावे. यासाठी शासनाबरोबर पत्रव्यवहार, मिटिंग सुरु आहेत. शासनानेही त्याला अनुकुलता दर्शवली आहे. कदाचित 430 दिंडी, विणेकरी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *