कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आषाढी यात्रा काळात भाविकांची पंढरीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून जिल्हाधीकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती असून या बाबत जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार असले तरी सध्यस्थिती पाहता या बाबत नक्कीच सकारात्मक आदेश निघतील हे गृहीत धरले जात आहे.
या काळात मंदिर परिसर,चंद्रभागा वाळवंट परिसर,प्रदक्षिणा मार्ग आदी ठिकाणी कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला आषाढीवारीसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही.
मानाच्या 10 पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे.
वारीसंदर्भात इतर निर्णय –
- देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.
- मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यास परवानगी.
- सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता
- शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच
- नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
- एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील.
- संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी