ताज्याघडामोडी

केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं. त्याला दोन्ही सरकारे दोषी आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा पार पडला. प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना हा आरोप केला. दोराय स्वामींचं जजमेंट आहे. त्याला रिव्हिजीट करण्याची गरज आहे.

त्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली पाहिजे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत आहे. दोन्ही सरकारांनी वेळीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला, असं आंबेडकर म्हणाले.

सर्व पर्यायांचा अवलंब करा

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती. ती पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता. आता ही भूमिका सगळ्यांना पटत आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने आधीपासूनच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता तरी मराठा आरक्षणासाठी जे जे पर्याय आहेत, त्याचा अवलंब केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आजच्या मराठा आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहेच. शिवाय ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नही सरकारने सोडवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

आंबेडकरांची एन्ट्री

दरम्यान, आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले होते. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं.

तर्कवितर्क

कोणतीही कुणकुण नसताना प्रकाश आंबेडकर या मोर्चात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीराजे आंबेडकरांना भेटले होते. त्याचवेळी आंबेडकरांनीही मोर्चात येण्याचं ठरलं होतं असं सांगितलं जातं. मध्यंतरी संभाजीराजे यांनी नव्या राजकीय पक्षाचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राज्यात नवं राजकीय समीकरण निर्माण तर करणार नाही ना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *