ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
सोलापूर,दि.11: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केले.
नियोजन भवन येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियानाद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि यांत्रिकी अवजारांचे वाटप प्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. भरणे यांच्या हस्ते जिल्ह्याला 5 कोटी 15 लाख रूपयांचे अनुदान मिळाले आहे. यातून जिल्ह्यातील 13 शेतकरी लाभार्थ्यांना ऑनलाईन सोडतीद्वारे 11 ट्रॅक्टर व दोन अवजारांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ छायाचित्रकार मिलिंद राऊळ यांच्या हस्ते ट्रॅक्टरची चावी शेतकऱ्याला देण्यात आली.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत कृषी यंत्र सामग्री व उपकरणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना खरेदीसाठी 50 टक्के अर्थसहाय्य तर अन्य शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीविषयक कोणत्याही योजनेसाठी https:/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *