पोटच्या दोन मुलांना दगडान ठेचून त्यांचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुंदेलखंडच्या झाशी जिल्ह्यात रानीपूर येथे घडली आहे. त्यांनतर या व्यक्तीनं स्वत:चा गळा कापून विहीरत उडी घेतली. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर आले आहे. रहिश असे पित्याचे नाव असून हर्ष (वय १२), अंश (वय ९) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
२२ मे रोजी रहिशचे आपल्या पत्नीबरोबर जोरदार भांडण झाले होते. रहिशला दारूचे व्यसन असल्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत वारंवर भांडण करत असे. दरम्यान रहिश आपल्या मुलांसह कपडे घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला.
संध्याकाळ झाली तरी ते तिघंही परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना येथील नागरिकांना लाडगंज येथील केदारेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले. यामुळे विहिरीत वाकून पाहिले असता विहिरीमध्ये त्यांना रहिश आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार, कौटुंबिक वादातून रहिशने हे जीवघेणं कृत्य केल्याचा संशय आहे. सुरुवातीला त्याने लहान मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत:चा गळा कापून विहिरीत उडी मारली त्यात त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.