राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व गरजू आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि अन्नधान्य वितरणासंदर्भात विभागाचे अधिकारी व राज्याच्या सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत आज मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.
मोफत शिवभोजन थाळी देत असताना ती नागरिकांना राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनुसार पार्सल स्वरुपात मिळणार आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रावर पार्सल स्वरूपात मिळणारे अन्न हे निकृष्ट स्वरूपाचे तर नाही ना याची खातरजमा देखील अधिकाऱ्यांनी करायला हवी त्याचप्रमाणे यामध्ये कोरोनाचे नियम व स्वच्छता ठेवली जात आहे का आणि अनियमितता किंवा गैरप्रकार होत नाही ना यावर देखील सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश श्री.भुजबळ यांनी आज दिले.