ताज्याघडामोडी

मुलीचा दाखला काढण्यासाठी महिला शाळेत; त्याच शाळेसमोर दोघींचा शेवट, मृतांची ओळख पटेना, अखेर..

जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले. त्या तिघांना रिक्षाने चिरडले. सोमवारी (२६ जून) सकाळी दहा वाजता हा अपघात घडला. भीषण अपघातात तीन जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराची ओळख पटली. मात्र सोबत असलेल्या इतर महिलेसह तरुणीची ओळख पटलेली नव्हती.

त्या दोघांचीही ओळख बुधवारी सकाळी पटली असून दोघेही मायलेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गायत्री प्रविण कुळकर्णी (वय-३४) आणि नंदिनी प्रविण कुळकर्णी (वय-११) अशी दोघींची नावे आहेत. त्या शिवाजी नगरात राहायला होत्या. महेश गोकुळ जोशी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते धरणगावचे रहिवासी होते.

जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी सकाळी दहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकुळ जोशी हे त्यांच्या दुचाकीने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि एक तरूणी बसलेली होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले.

तितक्यात जळगाव शहराकडून येणाऱ्या रिक्षाने रोडवरील तिघांना चिरडले. अपघातानंतर रिक्षा पलटी झाली. रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालक रविंद्र भावलाल पाटील जखमी झाले. या भीषण अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार आणि दोन अनोळखी महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दुचाकीवरील तीन जणांपैकी दुचाकीस्वार महेश जोशी यांची ओळख पटली होती. तर सोबत असलेल्या ४० वर्षीय महिला आणि तरुणीची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय नयन पाटील, कर्मचारी नरेंद्र पाटील, अनिल फेगडे, अनिल मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *