Uncategorized

११ वर्षाच्या परिचारक विरुद्ध भालके राजकीय लढतीचा उद्या अंतिम सामना 

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षात पक्ष हि गौण बाब ठरली असून परिचारक विरुद्ध आण्णा गट आणि परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवार असाच राजकीय संघर्ष तालुक्यात पहावयास मिळाला.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.औदूंबरअण्णा पाटील हे खटारा हे चिन्ह घेऊन नांगरधारी शेतकरी चिन्ह घेऊन समोर ठाकलेल्या जनसंघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात लढले आणि विजयी झाले.तेव्हा पासून परिचारक विरुद्ध आण्णा गट हि पंढरपुर तालुक्याच्या राजकरणात सुरु झालेली वर्चस्वाची लढाई पुढे तालुक्याच्या राजकारणात अतिशय महत्वाची ठरली.१९८१ च्या निवडणुकीत राज्यातील कॉग्रेसचे तत्कालीन बलाढ्य नेते स्व.खा. विठ्ठलराव गाडगीळ आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी आपले राजकीय वजन खर्ची टाकत स्व.पांडुरंग डिंगरे याना कॉग्रेसची उमेदवारी मिळवून दिली.स्व.आ.औदूंबर पाटील विरुद्ध तात्या डिंगरे हि लढत फुसका बार ठरेल आणि एकतर्फी निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच तात्यांनी बाजी मारली.या निवडणुकीत स्व.औदूंबर पाटील यांना पराभूत करण्यासाठी अकलूज वरून मोठी मदत झाली.आई परिचारकांनी स्व.औदूंबर पाटील यांच्या १७ वर्षाच्या आमदारकीला  डिंगरेना सहकार्य करीत ब्रेक दिला.त्याचीच पुनरावृत्ती या २०२१ च्या पोटनिवडणुकीत होत असून हि निवडणूक हि आमदार प्रशांत परिचारक यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे.पश्चिम महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघातून झालेल्या धक्कायदायक पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या देवेंद्र फडणवीस आणी भाजप नेत्यांनी  राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात असलेली जनभावना दाखवून देण्याच्या उद्देशाने या पोटनिवडणुकीत परिचारकांना बाजूला सारत आणि सोबत घेत २०१९ च्या मतांची गोळाबेरीज मांडत समाधान आवताडेंना उमेदवारी दिली आहे.या निवडणुकीत आवताडे विजयी झाले तर २०२२ ला विधान परिषदेची मुदत संपणाऱ्या परिचारकांना पुन्हा विधान परिषेदेत संधी निश्चित मानली जात आहे.आणि त्या मुळेच आवताडे विरुद्ध भालके या सरळ लढतीत पंढरपूर शहर आणि २२ गावातून आवताडेंना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आ.प्रशांत परिचारक यांच्यावर येऊन ठेपली आहे.   

    राज्यातील महविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने रान पेटवण्यात यश मिळविलेले असतानाच जर या पोटनिवडणुकीच्या निकालात कमळ कोमेजले तर याचा मोठा फटका आवताडेंपेक्षा परिचारकांना बसेल असे अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.आणि म्हणूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.आमदार भारत भालके यांच्या विरोधात थेट स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक हे निवडणूक लढवत असताना देखील पंढरपूर शहरातील मतदान केंद्र निहाय आणि २२ गावातील मतदान केंद्र निहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी समोर ठेवून टिळक स्मारक येथील सभेत आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या मालकांची शपथ घालूनही आपापल्या भागातून मताधिक्य देण्यास असमर्थ  ठरलेल्या नगरसेवक,प्रमुख पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांची गय केली जाणार नसल्याचे चित्र तूर्तास तरी दिसून येत आहे.केवळ नगर पालिकेत नगरसेवक म्हणून जनसामान्यात न मिसळणारा,व्यापारी,उदयोजक,बाहुबली असा चेहरा असलेल्या परिचारक सर्मथक नगरसेवकांनाही हि शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे.         

                २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील फडणीवस सरकार यांच्या विरोधातील जनभावना आणि शरद पवार याचा एकत्रित परिणाम म्हणून स्व.आ.भारत भालकेंचा विजय झाला होता असे राजकीय विश्लेषण त्या वेळी मांडण्यात आले होते.आता स्व.भालके यांचे पुत्र भगिरथ भालके हे समोर असताना आणि आवताडे आणि परिचारक गट एकत्र आले असताना शहरातील प्रभाग निहाय मतदान केंद्र आणि त्या ठिकाणी मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवर जसे शहरातील परिचारक समर्थक आजी-माजी-भावी नगरसेवकांची २०२१ च्या नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी निश्चित होणार आहे तशीच २०२२ मध्ये सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून आमदार प्रशांत परिचारक यांची भाजपकडून उमेदवारी अवलंबून आहे.त्यामुळेच भगिरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे अशी होत असलेली हि प्रमुख लढत जशी भालके गटाच्या दृष्टीने पंढरपूर शहर तालुक्यात अंतिम मानली जात आहे तशीच ती आ.प्रशांत परिचारक यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी निर्णायक मानली जात आहे.   

      २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.सुधाकरपंत परिचारक आणि स्व.भारत भालके यांच्यात बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित निर्णायक लढत झाली होती.त्यावेळी शहरातील जवळपास २५ टक्के मतदान केंद्राच्या मतमोजणीत परिचारक आघाडीवर होते तर नगर पालिकेत वर्चस्व असलेल्या शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी सह अनेक प्रभागातील मतदान केंद्रांच्या मतमोजणीत तेथील नगरसेवक परिचारक गटाचा असतानाही स्व.भालकेंना मताधिक्य मिळाले होते आणि या पोटनिवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणी उमेश परिचारक यांनी २०१९ ची आकडेवारी समोर ठेवत ”रिस्क फॅक्टर” लक्षात घेत तयारी केली असताना या निर्णायक लढाईत कुठून कुणाला मताधिक्य मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहर आणि तालुक्यातील २२ गावातील मतांची आकडेवारी !                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *