करोळे येथे ऐंशी पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत
पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीच्या झळा आम्हा करोळे च्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत मोलाची आहे.’ असे प्रतिपादन करोळेचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी केले.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. पुरामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी करोळे (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे ऐंशी पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात दिलीप भोसले यांनी डॉ. रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली आणि करोळे मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे करोळे मधील नागरिक कठीण परिस्थितीसोबत धीराने लढत आहेत. खरंच त्यांच्या संयमाला दाद द्यावी असे वाटते, कौतुक करावेसे वाटते. आपणा सर्वांना सध्याच्या या पूर परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे त्यामुळे कोणीही धीर सोडू नये. येथील अवस्था पाहून ‘फुल नाही तर फुलाची पाकळी‘ म्हणून छोटीशी मदत करावीशी वाटली म्हणून येण्याचे प्रयोजन केले. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका‘ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. पुरामुळे करोळे गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांची देखील पाहणी डॉ. रोंगे सरांनी केली. या निमित्ताने करोळे मधील सुमारे ऐंशी पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, हनुमंत बंडगर, महेश साठे, मधुकर सदगर, हरी साठे, तात्यासाहेब दगडे, शिवाजी पवार, चरण गायकवाड, महादेव दगडे, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह करोळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.