ताज्याघडामोडी

पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे 

पक्षाने दिलेले पद हे राजकीय उंची वाढविण्याचे साधन नाही याचे श्रीकांत देशमुख यांनी भान ठेवावे !

कर्तव्याधिन पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणे येथील जनतेला रुचणारे नाही

राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष असण्याबरोबरच नैतिकेतेचे मापदंड सातत्याने समोर ठेवत त्याच्या निकषावर वाटचाल करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने आपली ओळख निर्माण करण्यात बरेचशे यश मिळविले आहे आणि संघाच्या मुशीत घडलेल्या राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाला सुखवस्तू वर्गात हि प्रतिमा निर्माण करण्यासाठी मोठे बळ मिळाले आहे.भारतीय जनता पक्षाने श्रीकांत देशमुख यांची काही महिन्यापूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर सांगोला तालुक्यातील एक नेते ते जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते हा त्यांचा प्रवास अगदी सहजरित्या झाला आहे.एखाद्या पक्षाचे पद आणि प्रत्यक्ष आपल्या तालुक्यातील राजकीय वजन,राजकीय झेप या बाबी अगदी सर्वसामान्य जनतेला देखील माहिती असतात पण जिल्हाध्यक्ष हा जिल्ह्यात पॉवरबाज असतो अशी धारणा असल्यामुळे त्याकडे मतपेटीवर प्रभाव टाकू शकणारे पद या दृष्टीने न पाहता पतपेटीवर प्रभाव टाकू शकणाऱ्या लोकांचा नेता य दृष्टीने गेल्या अनेक दशकापासून पाहिले जात आहे.आणि याचे साधे उदाहरण म्हणजे श्रीकांत देशमुख यांच्याच तालुक्यातील राष्ट्रवादीचे ऍड. दीपक साळूंखे हे होय.

    पंढरपूर शहरात भाजपाच्या वतीने मंदिरे जनतेस दर्शनासाठी खुली करावीत या मागणीसाठी आज करण्यात आलेल्या आंदोलनावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर हा हाय सिक्युरिटी झोन मध्ये असल्याने व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदयाचा अमल सुरु असल्याने पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केलेल्या विनंतीचा विपर्यास करीत जो वाद घातला आहे तो अनाकलनीय आणि केवळ प्रतिमा प्रोजेक्ट करण्याचा तकलादू प्रयत्न आहे आणि यापूर्वी करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलना नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रतिक्रिया आहे असेच म्हणावे लागेल.    

              आज पंढरपूर शहरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचे दारे उघडावीत म्हणून आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.पण हे आंदोलन करताना श्रीकांत देशमुख यांना दोन बाबींचा विसर पडला होता.एक म्हणजे पंढरीचा पांडुरंग हा उभ्या महाराष्ट्राचे जसे आराध्य दैवत आहे तसेच या शहरातील अनेक कुटूंबाच्या उपजिविकेस हातभार लावणारे शक्तिस्थळ आहे.तरीही या आंदोनात शहरातील मंदीरावर उपजीविका असलेले किती व्यवसायिक सहभागी झाले होते याचा अभ्यास श्रीकांत देशमुख यांनी करावा.आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पंढरपूर तालुक्यात भाजपचे जे प्रभावशाली अस्तित्व दिसत आहे ते केवळ आणि केवळ परिचारक या नावाच्या वलयामुळे मात्र परिचारक यांनी कधी कुठल्या आंदोलनात पोलिसांना टार्गेट करत वाद घातल्याचे या शहराने पाहिले नाही.               

     मंदिरे खुली करावीत यासाठीचे भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन एकवेळ समर्थनीय असेल पण विशिष्ट ठिकाणी विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या ठिकाणी जर आंदोलन होत असेल आणि चुकून काही गैरप्रकार घडला तर त्याची जबाबदारी निश्चित करताना शासन आणि प्रशासन आधी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यास जबाबदार धरते याची जाणीव भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याना असती तर आंदोलनास आंदोनास विरोध नाही तर कायद्याची आणि नियमाची बांधिलकी जोपासत सूचना,इशारा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी वाद घालणे चुकीचे आहे हे देशमुख यांच्या लक्षात आले असते.        

  सत्ता कुणाचीही असो मंदिर परिसर हा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला गेला आहे.त्यामुळेच तर मंदिराच्या दारात कुठले आंदोलन होणार असेल तर पोलिसांची जबाबदारी वाढते.फडणवीस यांच्या सत्ताकाळात मंदिर परिसरातील फुलमाळा विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या आंदोलनावेळी असाच प्रकार घडला होता.त्यावेळी या आंदोलकांची बाजू घेत आ. भारत भालके यांनी आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेत पोलिसांशी घातलेली हुज्जत त्यांना कायदेशीर दृष्टया किती धावपळ करण्यास भाग पडली होती हे पंढरपूरकरांनी अनुभवले आहे आणि त्यापुढे आपणावर घंटानाद आंदोलन केले म्हणून दाखल झालेला गुन्हा हि किरकोळ  बाब आहे हे लक्षात घेत सत्ता कुणाचीही असो पोलिसांचे हात कायद्याने बांधले आहेत याचे भान ठेवावे म्हणजे एखाद दिवशीच्या हवेपेक्षा त्याचे एक संयमी नेता म्हणून पंढरपूर तालुक्यात राजकीय वजन वाढेल एवढेच.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *