तीन वर्षात 12 हजार पैकी 5800 जणांना नेमणूक आदेश
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या नावाखाली 2017 अभियोग्यता परीक्षा घेऊन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भावी शिक्षकांना भरतीचे गाजर दाखवत नादी लावले.त्यांचे ते काम अद्यापही सुरूच असून पहिली यादी लावून तब्बल एक वर्ष झाले तरी पुढची यादी पण लागेना आणि यादीत निवडलेल्या मुंबई महापालिकेतील 252 जणांना अजूनही नेमणूक आदेश निघाला नाही. तीन वर्षापासून चालढकल सुरू असल्याने डीएड बीएड धारक उमेदवारांतून संतापाची लाट उसळली आहे.
बारा हजार शिक्षक भरतीचा पहिला टप्पा म्हणून गेल्याच वर्षी नऊ ऑगस्ट 2019 रोजी पहिली शिक्षक भरतीची यादी लागली त्यामधून पाच हजार आठशे उमेदवारांना नोकरी देखील मिळाली परंतु पुढची यादी तब्बल एक वर्ष झाले तरी अजून लागली नाही. निवडलेल्या शिक्षकांना नेमणूक आदेश मिळत नाहीत तर ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा रिजेक्ट केले जाते त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचे व पवित्र पोर्टलचे नेमके काय सुरू आहे याचे कोडे कोणत्याही टीईटी, सीटीईटी व अभियोग्यता पात्र उमेदवारांना समजले नाही.
पवित्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच शालेय शिक्षण विभागाने दररोज जीआरचा मुरंबा घालून भावी शिक्षकांच्या डोक्यावरचे केस घालवण्याचे काम केले आहे. शिक्षक भरती झाल्याशिवाय लग्न न करणाऱ्यांची लग्न रखडली यासोबत कागदपत्र तपासणी झाल्यानंतर आहे या नोकरीचा राजीनामा देणाऱ्यांची अवस्था तर ना घर का ना घाट का अशी झाली आहे. नवीन भावी पिढी घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या उमेदवारांना शासनाने तीन वर्षापासून चाळण दाखवली आहे परंतु याचा कडेलोट होत आला असून सर्व उमेदवारांना आक्रमक झाले आहेत