ताज्याघडामोडी

गणेशदादा तुम्ही निश्चिंत रहा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहे – माजी आमदार संजय शिंदे स्व.राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार सोहळ्यात केले प्रतिपादन.

भोसे (क), प्रतिनिधी,

तीन-तीन टर्म आमदार झालेल्यांना अजून आमदारकी नीट कळाली नाही आणि एक महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी. राजकारणातली नैतिकता संपत चालली असली तरी आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूया यासाठी गणेश दादा तुम्ही निश्चिंत रहा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत असे प्रतिपादन करमाळा विधानसभेचे माजी आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

ते भोसे ता पंढरपूर येथे स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, व्हा. चेअरमन भारत कोळेकर व्हा. चेअरमन कैलास खुळे यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, सरपंच अॅड. गणेश पाटील, शिवाजीराजे कांबळे, रावसाहेब पाटील, लतीफ तांबोळी, प्रशांत देशमुख, शालिवाहन कोळेकर, शेखर पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रशांत परिचारक यांनी पूर्वीच्या काळी राजकारणात मतभेद असायचे परंतु मनभेद नव्हते त्यामुळे सुडाचे राजकारण कधी केले जात नव्हते. राजकारणात यश अपयश येत राहील अशाही परिस्थितीत टिकून राहणं महत्त्वाचं आहे आपला भविष्यकाळ उज्वल आहे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून नैतिकतेचे राजकारण करू असा विश्वास दिला. तर सध्याच्या काळात कुणी कुणाच्याही पाया पडून तीन साडेतीनशे कोटी आणते आणि आमदार होते यामुळे राजकारणाची पातळी खालावत चालली असल्याची टीका पंढरपूर माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
यावेळी कल्याणराव काळे यांनी स्व. राजूबापू आज असते तर तालुक्याचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते असे सांगून संघर्ष हा तर आपल्या पाचवीलाच पूजलेला आहे या संघर्षाला तोंड देऊ आणि आपण सारे मिळून पुढे जाऊया असे सांगून पक्ष बदलाचा माझा एक राऊंड पूर्ण झाला असल्याचे सांगताच लोकांमधून जोरदार हशा पिकला.
यावेळी कोमल पाटोळे यांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा ही भैरवी गायली त्यावेळी सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.

यांचा झाला सन्मान :
कोमल पाटोळे (कला गौरव पुरस्कार), वासुदेव पवार (आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार), श्रीमती मंगल शहा (आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार) अतुल बागल (कृषी भूषण पुरस्कार) वाल्मीक कोळी (उत्कृष्ट मृदंग वादक पुरस्कार).
पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह शाल फेटा आणि रोख रक्कम.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब कोरके यांनी केले. सूत्रसंचलन श्रीमती इंद्रायणी जवळ-मस्के यांनी केले तर आभार स्व. राजूबापू पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. बालाजी फोरके यांनी केले.

फोटो : भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंत सभागृहात स्व. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या वासुदेव पवार यांना आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना संजय शिंदे, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, युवराज पाटील, शिवाजी कांबळे, रावसाहेब पाटील, गणेश पाटील यांच्यासह मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *