ताज्याघडामोडी

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६० रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकटलक्षम्मा होते. डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी म्हैसूर सरकारच्या सहकार्याने पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ साली इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते शासकीय सेवेत रुजू होत असताना मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले.

        १८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर’ या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध सक्कर‘ बंधाऱ्याची योजना आखली. १८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली तसेच धरणातून वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची आगळी वेगळी रचना केली. हैद्राबाद येथील मुसा‘ आणि ईसा‘ या नद्यांवर देखील धरण बांधले. तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संरक्षण केले. म्हैसूरच्या राजांनी त्यांना संस्थानचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते. १८९२ साली डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.

         डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली. म्हैसूरमधील The Sandal oil Factory, The Metals Factory, The soap Factory, The crome tying factory, Bhadravati Aryans and Steel Works हे सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचेच फलित आहेत. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले. बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी आणि मुंबईची प्रिमियर कंपनी हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे. देशात अर्थव्यवस्था नियोजन असावेयावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या हे पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया‘ हे पुस्तक लिहिले आहे. व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी बँक ऑफ म्हैसूर‘ ची स्थापना देखील केली.

           डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाध्या मिळाल्या. ब्रिटिश सरकारने त्यांना सर्वोच्च अशा सर‘ या उपाधीने गौरवलेतर देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी १९५५ साली त्यांना भारतरत्न‘ या उपाधीने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. त्यांनी देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, ‘अभियंता दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *