ताज्याघडामोडी

मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार; राज्य सरकारचं टेन्शन वाढणार

मनोज जरांगे पाटील आजपासून (१० फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते.

सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियामधून होत आहे. या टीकेवरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे.

माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. यासोबतच १० फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार, असंही जरांगे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा बांधवांनी देखील या आंदोलनाला पाठींबा देऊन आपापल्या आमदारांना तातडीने फोन करावे, असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो, की मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभा रहावं, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *