ताज्याघडामोडी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता -आ.समाधान आवताडे यांची माहिती

मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून सर्वच पक्षाचा राजकीय अजेंडा बनलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली असून काही विभागाच्या परवानग्या घेऊन लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर जाईल व निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पार पडेल अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला होता त्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून या प्रस्तावामध्ये भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ९५ किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक २.०४ अघफु(५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील २४ गावातील १७१८६ हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी वापरण्यात येणार आहे अशा या प्रस्तावास शासन निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ मधील निर्देशांकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली असून लवकरच ही योजना मार्गी लागणार असल्याचे आमदार अवताडे यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची पाणी प्रश्नावर असणारी तळमळ लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा पाणीप्रश्न वेळोवेळी शासन दरबारी लावून धरला आहे. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व ही योजना लवकरात- लवकर मार्गी लागावी यासाठी वारंवार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा व प्रत्यक्ष पत्र व्यवहार केला होता.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आ आवताडे यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितले होते की, या मतदारसंघांमध्ये तुम्ही आमदार आवताडे यांना विजयी करुन त्यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला आणखी एक लोकप्रतिनिधी द्या व त्यानंतर मंगळवेढा उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी मी स्वतः राज्यातून नाही मिळाला तर केंद्रातून निधी आणेन पण ही योजना पूर्ण करेन असा शब्द दिला होता. नंतरच्या काळात राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.त्यामुळे योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक मंजुरीची चक्रे गतिमान झाली स्वतः फाइल घेऊन प्रत्येक टेबलावर जाऊन अडचणी सोडवित ना.फडणवीस यांच्या माध्यमातून मोठे यश मिळताना दिसत असून येत्या काही दिवसात या योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मिळून त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याचे आ आवताडे यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *