गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या !

आधुनिक काळातही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली असून प्रेमविवाहाला असलेल्या विरोधातून वडील आणि भावाने तरुणीसह तिच्या पती आणि मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर येथील गोपाळपूर परिसरात राहणाऱ्या चंदा देवी आणि चंदन कुमार यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र चंदाच्या कुटुंबीयांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता. त्यामुळे चंदा देवी आणि चंदन कुमार यांनी २०२१ मध्ये पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध असल्याने लग्नानंतर दोघेही दूर जाऊन राहात होते. दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले. मात्र आजचा दिवस या जोडप्यासाठी भयंकर ठरला.

चंदा देवी आणि चंदन आपल्या २ वर्षीय मुलीसह कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर वाटेत दबा धरून बसलेल्या चंदाचे वडील पप्पू सिंह आणि भाऊ धीरज कुमार यांनी त्यांना अडवलं आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. या गोळीबारात चंदा आणि चंदन या जोडप्यासह त्यांची २ वर्षीय मुलगीही जागीच ठार झाली. प्रेमविवाहाच्या रागातून घडलेल्या या घटनेनं बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र अजूनही आरोपींना पकडण्यात यश आलं नसून जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *