बेपत्ता तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी प्रेयसीच्या नातेवाईकांवर खुनाचा आरोप केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी बेवारस सापडलेल्या तरुणाचा मृतदेहही पुरला. पोलिसांच्या या भूमिकेने तरुणाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. २४ वर्षीय अभिषेक सुरेश मिश्रा असे मृताचे नाव आहे.
अभिषेक हा मूळचा उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होता. तो यापूर्वी रायपूरमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तेथे त्याची दीड वर्षांपूर्वी नागपूरच्या प्रतापनगर येथील एका तरुणीशी मैत्री झाली. जून महिन्यात ही मुलगी रायपूरहून घरी परतली होती. तिच्यासोबत अभिषेकही नागपुरात आला होता. तो कोराडी मार्गावरील एका हॉटेलमध्ये कामाला होता. २५ जुलै रोजी अभिषेक मुलीच्या घरी गेला. तेथे त्याचा मुलीच्या कुटुंबीयांशी वाद झाला. या वादातून अभिषेकला मुलीच्या घरच्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी आले होते. त्यानंतर अभिषेकचा मोबाइल बंद पडल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी मैत्रिणीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी अभिषेकला सीताबर्डी मेट्रो स्टेशनजवळ सोडल्याचे सांगितले. अभिषेक बेपत्ता झाल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
अभिषेकच्या कुटुंबीयांनी १ ऑगस्ट रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून प्रेयसीच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले असता प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला सीताबर्डी मेट्रो स्थानकाजवळ सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी गांभीर्य न दाखवल्याने अभिषेकचे कुटुंब हताश झाले. बुधवारी त्यांनी उत्तर भारतीय संघटनेचे नेते उमाकांत अग्निहोत्री यांच्या मदतीने झोन १ चे डीसीपी अनुराग जैन यांची भेट घेतली. यानंतर पोलीस कारवाईला वेग आला आहे.