पती त्याच्या बहिणीकडे गेला असल्यानं पत्नी घरी एकटी होती. त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ घरी आले. आईनं तिचे हात धरले. भावानं पाय पकडले आणि वडिलांनी तिचा गळा आवळला. यानंतर तरुणीचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी गाव गाठलं. तिथे जंगलात अंत्यविधी केले. पतीला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. गावातील एका मित्रानं त्याला फोन करुन घटनाक्रम सांगितला. तुझ्या बायकोचा मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यविधीही करण्यात आले, अशी माहिती त्यानं दिली. त्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं पोलिसात धाव घेत सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
घटना १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता घडली. २२ वर्षांची अंजली गुरुग्रामच्या सेक्टर १०२ मधील रॉफ ऍल्यसमध्ये फ्लॅट नंबर २०१ मध्ये पती संदीपसोबत राहायची. अंजली बीएएससीचं शिक्षण घेत होती. गुरुवारी संदीप त्याच्या बहिणीच्या घरी तीजची मिठाई घेऊन गेला होता. त्यावेळी अंजलीच्या फ्लॅटवर भाऊ कुणाल, वडील कुलदीप आणि आई रिंकी पोहोचले. त्यांनी अंजलीवर हल्ला केला. आईनं अंजलीचे हात पकडले, भावानं पाय घट्ट धरले. त्याचवेळी वडिलांनी तिचा गळा दाबला. हत्येनंतर तिघांनी मिळून अंजलीचा मृतदेह कारमध्ये ठेवला. त्यानंतर ते गुरुग्रामहून झज्जरमधील आपल्या गावी म्हणजेच सुरेतीला गेले.
अंजलीच्या कुटुबियांनी गावातील निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. गावातील कोणालाच याचा मागमूस लागला नाही. पण हळूहळू बातमी पसरली. गावातील एकानं अंजलीच्या पतीला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. संदीपला धक्काच बसला. त्यानं घटनेबद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीनं अंजलीच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं. चौकशीत तिघांनी हत्येची कबुली दिली.