ताज्याघडामोडी

सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, आक्षेपार्ह शब्दांत केली शरद पवारांवर टीका

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.मात्र, यावेळी टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. खोत यांनी शरद पवार यांचा सैतान असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पूर्वी बापाने केलेलं पाप मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच फेडावे लागते. शरद पवार यांना हे पाप फेडावं लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. पुढे सदाभाऊ खोत म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकारण हे प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील यांचं मोठं योगदान आहे. 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला आणि तिथून राजकारण्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एवढ्यावरच ते न थांबता पुढे म्हणाले, राजकारणात वाडे विरूद्ध गावगाडे, प्रस्थापित विरूद्ध विस्थापित असा संघर्ष शरद पवार यांच्या काळात उभा राहिला. 50 वर्ष हेच सुरू आहे. शरद पवार यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला असून, त्यांना गावगाड्याकडे धावत यावं लागत आहे असल्याचा घणाघात खोत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *