ताज्याघडामोडी

जिथे वरात आली, तिथूनच अंतयात्रा निघाली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवदाम्पत्यासह ५ जणांचा खून

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली. लग्नघरात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे काही तासांपूर्वी आनंदात असलेलं कुटुंब शोकसागरात बुडालं. लहान भावाच्या लग्नात मोठा भाऊ उत्साहानं सहभागी झाला होता. मात्र शनिवारी सकाळी त्यानं नवविवाहित भाऊ, त्याच्या पत्नीसह आणखी तिघांवर जीवघेणा हल्ला केला. भावाचा चेहरा, मान आणि हातावर त्यानं कोयत्यानं वार केले. त्यानंतर त्यानं वहिनीच्या चेहऱ्यावर वार केले.

तरुणानं त्याच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्राची निर्घृणपणे हत्या केली. घरात सगळे झोपले असताना आरोपीनं त्यांच्यावर वार सुरू केले. कोयत्यानं वार करत तरुणानं पाच जणांना संपवलं. नवविवाहित भाऊ, त्याची पत्नी यांच्यासह तिघांचा जीव आरोपीनं घेतला. आरोपीनं स्वत:ची पत्नी आणि मामीवरदेखील हल्ला चढवला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.

गोकुलपूर अरसारामध्ये राहणाऱ्या सुभाषचंद्र यादव यांना तीन मुलं आहेत. शिववीर, सोनू आणि भुल्लन अशी त्यांची नावं आहेत. शुक्रवारी सोनूचा विवाह सोहळा संपन्न झाला. इटावातील चौबियामधील गंगापूर गावात वरात आली. घरात नव्या सुनेचं स्वागत करण्यात आलं. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सगळेजण डीजेवर नाचत होते. घरात आनंदाचं वातावरण होतं.

रात्रीच्या सुमारास शिववीरनं सगळ्यांच्या शितपेयात नशेच्या गोळ्या टाकल्या. सगळे जण बेशुद्ध पडले. यानंतर शिववीरनं भाऊ भुल्लन, भावजी सौरभ, भावाचा मित्र दीपक, भाऊ सोनू, वहिनी सोनीची कोयत्यानं हत्या केली. हल्ल्यात सुभाष, आरोपी शिववीरची पत्नी आणि मामी गंभीर जखमी झाली. पाच जणांची हत्या केल्यानंतर शिववीरनं स्वत:वर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावात मोठा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *