ताज्याघडामोडी

भावाच्या वाढदिवसाला आल्या; दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचरजवळ असलेल्या एकलहरे गावच्या हद्दीत घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरती शाम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७, दोघी रा. मुंबई बांद्रा) असं या बहिणींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती आणि प्रीती या दोघी त्यांच्या मावस भावाच्या वाढदिवसासाठी १० दिवसांपूर्वी मुंबई बांद्रा येथून एकलहरे येथे आल्या होत्या. काल बुधवारी त्यांच्या घरी मावस भावाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. आज गुरुवारी दुपारी आरती, प्रिती आणि कावेरी बाळासाहेब आलझेंडे (वय १२) या तिघींसह पाच जण नदीवर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी कपडे धुवत असताना कावेरीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी प्रीती खंडागळे आणि आरती खंडागळे या दोघी बहिणींनी नदीत उडी मारली.

पाण्याचा अंदाज न आल्याने प्रीती आणि आरती नदीत बुडाल्या, त्यांना वाचविण्यासाठी काठावर उभे असलेल्या महिलांनी आवाज दिला. त्यावेळी राम फलके, स्वप्निल गुळवे, अक्षय धोत्रे यांनी पाण्यात उडी मारून मुलींना पाण्याच्या बाहेर काढले. कावेरी ही बाजूला दगडात अडकली असल्याने ती वाचली. मात्र, आरती आणि प्रीती यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलीस निखिल गाडे यांनी मंचर पोलिसांना दिली. मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मयत आरती आणि प्रीती यांना रुग्णवाहिकेने चालक गौरव बारणे यांनी मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे आणले आहे. मयत मुलींच्या कुटुंबीयांना हवी ती मदत करण्याचे आश्वासन देवेंद्र शेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळकंठ काळे यांनी दिलं. या घटनेनं खंडागळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *