बिहारमधील सुपौलमध्ये एका नवविवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी महिलेचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंड्यासाठी मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत शांती देवीचे वय अवघे १९ वर्षे होते. मृत विवाहितेचा भाऊ सुरेंद्र शर्मा याने सांगितले की, त्याने आपल्या बहिणीचे हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी मुलाच्या हातात एक लाख ११ हजारांची भेटवस्तू ठेवल्या होत्या. पण, लग्नाच्या महिनाभरानंतर पती दीपक शर्मा याने दुचाकीची मागणी करण्यास सुरुवात केली. दुचाकी देण्यास नकार दिल्याने त्याने शांतीचा छळ सुरू केला, असा आरोप करण्यात आला आहे.
यादरम्यान, शांती देवीला बेदम मारहाण करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह फासावर लटकवला. त्यानंतर मृत विवाहितेच्या पतीने सासरच्या घरी फोन केला आणि शांती देवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं, असा आरोप आहे.