घरात दोन पोरींचं लग्न होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मुलींचं लग्न होतंय म्हणून त्यांची आई खूप खूश होती. पण, नियतीला या कुटुंबाचा आनंद बघवला नाही आणि लग्नाच्या ४ दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
दोन मुलींच्या लग्नाच्या ४ दिवसांपूर्वीच या आईचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ज्यावेळी ही महिला अपघाताची बळी ठरली, त्यावेळी ती नातेवाईक महिलांसोबत तांदुळ मागायला गेल्या होत्या. या सर्व महिला ऑटो रिक्शामधून प्रवास करत होत्या. तेव्हा अनियंत्रिक ट्रकने त्यांच्या ऑटो रिक्शाला धडक दिली. ट्रकने धडक देताच ऑटो रिक्शा उलटली आणि सर्व महिला जखमी झाल्या. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. जिचा मृत्यू झाला त्या या दोन मुलींची आई होत्या ज्यांचं १० मे रोजी लग्न होतं. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर चालकाचा शोध सुरु आहे. पण, ट्रक चालकाने ट्रक दरीत टाकून तो फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोशाळा शिवपुरी येथील रहिवासी कुशवाह कुटुंबातील सुमारे डझनभर महिला तांदूळ मागण्यासाठी ऑटो रिक्शाने ग्रामपंचायत गोहरी येथे जात होत्या. तेव्हा समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काही सेकंदात ऑटो रिक्शा उलटली आणि त्यात बसलेल्या सर्व महिला गंभीर जखमी झाल्या.